पिंपळे गुरव स्मशानभूमीत रॅम्पऐवजी रुंद पायऱ्या करा; अरुण पवार यांची मागणी
पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ खांदेबदलीच्या ठिकाणी करण्यात आलेल्या रॅम्पमुळे अंत्ययात्रेदरम्यान मयत खांद्यावर घेऊन जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः पावसाळ्यात पाय घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित रॅम्प काढून त्या ठिकाणी रुंद व टप्प्याटप्प्याने पायऱ्या करण्यात याव्यात, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री (महाराष्ट्र शासन) वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार विजेते अरुण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी हे निवेदन स्वीकारले.
महापालिकेने स्मशानभूमीचे नूतनीकरण केले असले, तरी प्रत्यक्ष वापराच्या दृष्टीने काही गंभीर त्रुटी राहिल्याचे पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. मुख्य प्रवेशद्वार सुमारे २५ फूट रुंद असून, अंत्ययात्रा आल्यानंतर खांदेबदलीसाठी स्वतंत्र थांबा तयार करण्यात आला आहे. मात्र, त्या ठिकाणाहून मयत खांद्यावर घेऊन पुढे जाताना रॅम्पमुळे संतुलन राखणे कठीण होत असून अनेकदा पाय घसरण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी रॅम्पऐवजी सुरक्षित आणि रुंद पायऱ्यांची व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, सध्या ज्या बाजूला अरुंद पायऱ्या आहेत त्या ठिकाणी सुधारणा करून ॲम्ब्युलन्स, टेम्पो किंवा अंत्यविधीचे साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांना सहज प्रवेश मिळेल, अशी रचना करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अंत्यविधीच्या वेळी सुमारे एक ते दीड हजार नागरिक उपस्थित असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून स्थापत्य विभागाने तातडीने जागेची पाहणी करून आवश्यक बदल करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कोट :
“गेल्या पंधरा दिवसांपासून या गंभीर समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, या संवेदनशील विषयाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तात्काळ पाहणी करून रॅम्पऐवजी रुंद पायऱ्यांची व्यवस्था करावी.”
— अरुण पवार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री (महाराष्ट्र शासन) वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार विजेते

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





