दोन महिन्यांपासून पाणीटंचाई; नगरसेविका दिप्ती कांबळे यांचे पाणीपुरवठा विभागाला निवेदन
दोन महिन्यांपासून पाणीटंचाई; नगरसेविका दिप्ती कांबळे यांचे पाणीपुरवठा विभागाला निवेदन
कु. दिप्ती अंबरनाथ कांबळे यांचे पाणीपुरवठा विभागाला निवेदन
नवी सांगवी प्रतिनिधी :
प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. समता नगर, संत तुकाराम नगर, गणेश नगर, किर्ती नगर, स्वामी विवेकानंद नगर, आदर्श नगर, क्रांती चौक, राजाराम नगर या भागांमध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
मुळात दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही तोही नियमित न मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याअभावी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत नवी सांगवी प्रभागातील नगरसेविका कु. दिप्ती अंबरनाथ कांबळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निवेदन दिले. विस्कळीत पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात तसेच नागरिकांना दिलासा मिळावा, अशी ठोस मागणी त्यांनी यावेळी केली.
नगरसेविका कांबळे यांनी पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी अजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पाणीपुरवठ्यातील अनियमितता तात्काळ दूर न झाल्यास नागरिकांचा असंतोष तीव्र होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नवी सांगवीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





