राहुल गांधींना इंग्रजीतील ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट; आळंदी-देहू भेटीचे निमंत्रण
राहुल गांधींना इंग्रजीतील ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट; आळंदी-देहू भेटीचे निमंत्रण
नवी दिल्ली / पिंपरी-चिंचवड : भारतीय समाजजीवनात राजकारण आणि अध्यात्म हे दोन स्वतंत्र प्रवाह असले, तरी त्यांचा अंतिम हेतू समाजकल्याण हाच असल्याची भावना व्यक्त करत स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची नवी दिल्ली येथे भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांचा इंग्रजी भाषेतील ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला.
यावेळी राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची माहिती देण्यात आली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत चोखामेळा यांनी समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिल्याचे सांगत, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा आत्मा असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
तसेच राहुल गांधी यांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे, देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे तसेच पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे दर्शन घ्यावे, असे निमंत्रण देण्यात आले. या भेटीद्वारे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या समतेच्या विचारांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी पुणे जिल्ह्यात राहुल गांधी यांचा दौरा झाल्यास काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश दत्तात्रेय नवले यांनी व्यक्त केला.
राजकारण आणि अध्यात्म यांचा संगम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो, या भावनेतून ही भेट पार पडल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील समता, प्रेम, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देशभर पोहोचावा, हीच या भेटीमागील प्रमुख भूमिका असल्याचेही नवले यांनी स्पष्ट केले.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





