नदी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी” — सचिन साठे
नदी स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी” — सचिन साठे
पिंपरी–चिंचवड प्रतिनिधी :
वाकड ते औंधपर्यंत वाहणारी मुळा नदी वाढत्या प्रदूषणामुळे संकटात सापडली असून, नदीच्या स्वच्छतेसाठी तातडीने सामूहिक कृतीची गरज आहे, असे मत समाजसेवक श्री. सचिन मुरलीधर साठे यांनी व्यक्त केले.
स्थानिक पातळीवर नदीकिनारी कचरा टाकणे, सांडपाण्याचा अनियंत्रित प्रवाह आणि अस्वच्छता वाढत असल्याने नदीचे नैसर्गिक स्वरूप बिघडत चालले आहे. पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साठे म्हणाले,
“नदी स्वच्छ, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नाही; प्रत्येक नागरिकाने स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून केलेल्या छोट्या–छोट्या प्रयत्नातून मोठे परिवर्तन घडू शकते.”
त्यांनी पुढे सांगितले की,
— नदीकिनारी कचरा न टाकणे
— प्लास्टिकमुक्त परिसराची अंमलबजावणी
— सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन
— वृक्षारोपण आणि जनजागृती
हे उपाय अमलात आणले तर मुळा नदी पुन्हा निसर्गरम्य आणि स्वच्छ स्वरूपात दिसू शकते.
नदी सुधार योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.
मुळा नदीचे पुनर्जीवन हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याचा व्यापक उद्देश असल्याचा सुर साठे यांनी लावला.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





