परतीच्या पालखी प्रवासातही वारकऱ्यांच्या सेवेसाठी अरुण पवार यांचे मोफत पाणी टँकर
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी वृक्षमित्र अरुण पवार यांनी यंदाही मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत. पंढरपूर ते आळंदी या संपूर्ण पालखी मार्गावर सात पाणी टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असून, परतीच्या प्रवासातही ही सेवा अखंड सुरू ठेवण्यात आली आहे.
आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी ऊन, पाऊस आणि थकवा यांची पर्वा न करता पायी प्रवास करतात. या प्रवासात पिण्याच्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासते. ही गरज लक्षात घेऊन अरुण पवार गेल्या बारा वर्षांपासून पालखी सोहळ्यासोबत मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत आहेत. यंदाही त्यांनी सात टँकरची व्यवस्था केली असून, पालखीच्या परतीच्या प्रवासातही ही सेवा सुरू ठेवली आहे.
या उपक्रमामुळे परतीच्या वाटेवरही वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत नसून, हजारो वारकऱ्यांची तहान वेळेवर भागत आहे. अरुण पवार यांच्या या सातत्यपूर्ण सेवाभावाचे वारकरी संप्रदायासह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
“वारकऱ्यांची सेवा हीच माझ्यासाठी विठ्ठलाची सेवा आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य लाभले, हेच माझे मोठे समाधान आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी कोणत्याही वारकऱ्याला त्रास होऊ नये, या भावनेतून गेली १२ वर्षे ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे आणि पुढेही सुरूच राहील.” – अरुण पवार

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





