ताज्या घडामोडीदेश-विदेशमहत्त्वाचेमहाराष्ट्रशहर

विकसित भारत हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असले पाहिजे – अविनाश धर्माधिकारी


विकसित भारत हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असले पाहिजे – अविनाश धर्माधिकारी
नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे ‘भारत 2047 आणि मी’ व्याख्यानमालेचे आयोजन
पुणे : स्वच्छ, चारित्र्यवान, प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी ही देशाची संपत्ती आहे. आपले काम प्रामाणिकपणे करणारा प्रत्येकजण हा देशभक्त आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा 2047 मध्ये भारत एक विकसित राष्ट्र होईल हे प्रत्येक नागरिकांचे स्वप्न असले पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केले पाहिजे असे मत निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि चाणक्य मंडल संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत 2047 आणि मी’ या विषयावरील व्याख्यानमालेत अविनाश धर्माधिकारी बोलत होते. संस्थेचे वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहेंदळे, विश्वस्त अमेय सप्रे, प्रीतम थोरवेआदि यावेळी उपस्थित होते.

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तेंव्हा काम करताना तुमच्यातील भारत मातेचा कार्यकर्ता कायम जिवंत राहिला पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ त्या पदावर आहेत म्हणून त्यांचेच केवळ भारत विकसित राष्ट्र असावा हे स्वप्न असले नाही पाहिजे. तर प्रत्येक नागरिकाचे असे स्वप्न असले पाहिजे की माझा भारत हा विकसित राष्ट्र झाला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहील.

प्रशासन हे देशसेवेचे माध्यम आहे. त्यातून राष्ट्रसेवा आणि विकासाला गती दिली पाहिजे. अमेरिका हे राष्ट्र केवळ अब्राहम लिंकन यांच्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे सुपर पॉवर झालेला नाही तर तेथील प्रत्येक नागरिकाच्या प्रयत्नामुळे अमेरिका विकसित राष्ट्र झाले आहे. अशाच प्रकारे भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी भारताचा प्रत्येक नागरिकांनी प्रामाणिकपणे हातभार लावला पाहिजे. आधुनिक काळातही भारत एक विकसित राष्ट्र होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सेमी कंडक्टर यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपण अग्रस्थानी राहिले पाहिजे तरच देश हार्डपॉवर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भविष्यात पुढे राहील असा विश्वास अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रस्ताविकापर भाषणात अमेय सप्रे म्हणाले, देश प्रथम हे आमच्या संस्थेचे कायम ध्येय ठेवलेले आहे आणि त्यानुसारच आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. त्यामध्ये प्राधान्याने आम्ही पॉलिसी रिफॉर्म करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. वक्फ बोर्डाच्या संदर्भात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संयुक्त समितीला आमच्या संस्थेने सादरीकरण केले होते, त्यातील काही बाबींचा त्या संस्थेने अंतर्गत केला हे आमच्या संस्थेचे यश आहे.
सायली गोडबोले जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर  पुष्कराज सप्रे यांनी आभार मानले.


GOLDEN PENN

संपादक :  भाग्यश्री बि एम/ Golden Penn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *