पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी
पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी
पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर याच मार्गाने व्हावी, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. या प्रकल्पासाठी जनआंदोलन उभे राहत असल्याची माहिती देत, अनेक प्रकल्पांना विरोध होत असताना पुणे-नाशिक रेल्वेसाठी मात्र नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रकल्पाचा मार्ग बदलण्याऐवजी पूर्वी प्रस्तावित मार्गानेच रेल्वे व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. याबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीच्या अहवालावर पुढील निर्णय अवलंबून असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले.
दरम्यान, उरण-तळेगाव-चाकण-संभाजीनगर असा मालवाहतुकीसाठी समर्पित नवीन रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची मागणीही डॉ. कोल्हे यांनी केली. न्हावाशेवा बंदराला जोडणाऱ्या या कॉरिडॉरमुळे तळेगाव, चाकण, रांजणगाव, संभाजीनगरसह विविध औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांना कच्चा माल व तयार मालाच्या वाहतुकीसाठी स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होईल. सध्या मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक रस्त्याने होत असल्याने वाहतूक कोंडी, इंधनाचा खर्च आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
चाकण विमानतळासाठी प्रस्तावित जागेवर पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत टर्मिनल उभारण्याची मागणीही त्यांनी केली. औद्योगिक तसेच शेतीमालाच्या वाहतुकीला चालना देण्यासाठी हे टर्मिनल महत्त्वाचे ठरू शकते, असा मुद्दा त्यांनी मांडला. पुणे-नाशिक रेल्वे, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर आणि चाकण टर्मिनल या तिन्ही मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉ. काकोडकर समितीचा अहवाल सकारात्मक यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
चाकणला टर्मिनलची मागणी
“चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागी पीएम गतीशक्ती टर्मिनल उभारण्यात यावे. औद्योगिक तसेच शेतीमालाच्या वाहतुकीसाठी स्वस्त व जलद पर्याय मिळेल. सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्नही काही अंशी सुटेल.”
— डॉ. अमोल कोल्हे, खासदार

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





