सृष्टी चौकात सिग्नलची तातडीची गरज – अरुण पवार यांचे वाहतूक विभागाला निवेदन
सृष्टी चौकात सिग्नलची तातडीची गरज – अरुण पवार यांचे वाहतूक विभागाला निवेदन
स्थानिक नागरिकांचा वाढता पाठिंबा; वाहतूक कोंडी व अपघातांमुळे प्रवाशांचे हाल
पिंपळे गुरव, प्रतिनिधी :
पिंपळे गुरवच्या महत्त्वाच्या सृष्टी चौकात वाढत्या वाहतूक कोंडीचा आणि अपघातांच्या मालिकेचा प्रश्न गंभीर बनत असून, या चौकात तातडीने वाहतूक नियंत्रक सिग्नल बसविण्याची मागणी जोर धरत आहे. प्रभाग २९ चे मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांना औपचारिक निवेदन सादर केले.
निवेदनात पवार यांनी नमूद केले की—
तुळजाभवानी मंदिर ते वाकड–भोसरी बीआरटीएस मार्गादरम्यानचा सृष्टी चौक आज वाहतुकीचा ‘ब्लॅकस्पॉट’ ठरू लागला आहे. अवघ्या ५०० मीटर अंतरासाठी प्रवाशांना १ ते १.५ तास कोंडीत अडकावे लागत आहे. चौक प्रशस्त असला तरी सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहनांचा विस्कळीत ओघ सतत वाढत आहे.
औंध–सांगवी येथून पिंपरी, पिंपळे सौदागर आणि औद्योगिक परिसराकडे जाण्यासाठी स्कुल बसेस, कंपनी बसेस, पीएमपीएमएल, रिक्षा, दुचाकीस्वार या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच कासारवाडी, जगताप पेट्रोल पंप, सांगवी, औंध आणि बीआरटीएस मार्गावरून येणाऱ्या सर्व वाहनांचे संगम बिंदू असल्याने सृष्टी चौकात गोंधळ, कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वाहतूक पोलिसांची नेमणूक आणि सिग्नल बसविणे अत्यावश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
यावर स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि रहिवाशांनीही जोरदार समर्थन दर्शवून या मागणीला अधिक ताकद मिळाली आहे.
नागरिकांचे म्हणणे एकच—
“सिग्नल लावा… सृष्टी चौकातील गोंधळ थांबवा!”

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





