वेदश्री तपोवनात तीन दिवसीय गीता जयंती महोत्सवाची भव्य सुरुवात!
वेदश्री तपोवनात तीन दिवसीय गीता जयंती महोत्सवाची भव्य सुरुवात!
आळंदी, पुणे | २९ नोव्हेंबर २०२५
इंद्रायणीच्या पावन तीरावर, संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यभूमीत आज अध्यात्मिक ऊर्जेचा दरवळ पसरला होता. वेदश्री तपोवन कार्य समिती आणि सहयोगी संस्थांतर्फे आयोजित तीन दिवसीय गीता जयंती महोत्सवाचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात झाला. आळंदी–मोशी येथील वेदश्री तपोवन येथे २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव संपन्न होत आहे. या भव्य महोत्सवाचे यजमान पुण्यातील प्रख्यात उद्योजक तथा महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी श्री अभय सुरेशकुमार भुतडा आहेत.
ध्वजारोहण आणि उद्घाटन सोहळ्याने रंगला पहिला दिवस
सकाळी ९ वाजता ब्रह्मचारी हनुमान चैतन्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी श्रीराम जन्मभूमि न्यास, अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज, कार्यक्रमाचे यजमान श्री अभय भुतडा आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या ऐतिहासिक ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा श्री अभय भुतडा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव मान्यवर उपस्थित होते.
“गीता आणि शिवछत्रपतींचे अनुसरणच राष्ट्रोद्धाराचा मार्ग” — प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज
स्वामीजींनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले —
“संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ सामान्य जनतेपर्यंत आणला. गीता ही वेदांचे सार आहे आणि जीवन कसे जगायचे हे शिकवणारी दिव्य ग्रंथरूप दिशा आहे. भारत मजबूत झाला तर जगात शांती आणि समृद्धी आपोआप येईल. राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांनी संस्कृती, परंपरा आणि धर्माचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. आपल्या गौरवशाली परंपरेसाठी ‘गीता’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे अनुसरण हीच खरी दिशा आहे.”
स्पर्धा विजेत्यांचा गौरव
गीता परिवारातर्फे पुणे जिल्हा स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि श्री अभय भुतडा यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
वारकरी साधकांचा सन्मान आणि कीर्तनाने दिवसाची सांगता
सायंकाळी वारकरी साधकांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
आळंदीतील अध्यात्मिक महोत्सवाची सुरुवातच इतकी दिव्य झाली असल्याने पुढील दोन दिवसांत श्रद्धा, संस्कृती आणि आध्यात्मिक अनुभूतींचा अजून मोठा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





