उपनगरांतील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; फुटपाथवरील हातगाड्या हटवल्या
उपनगरांतील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; फुटपाथवरील हातगाड्या हटवल्या
उपनगरांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया ह्युमन राइट असोसिएशन, पुणे जिल्हा (भारत सरकार) चे सचिव अतुल पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माननीय आयुक्त श्रावण हार्डीकर यांना पत्र देत उपनगरांतील अतिक्रमणावर सरसगट कारवाई करण्याची मागणी केली होती.
पत्रात नमूद करण्यात आले होते की, फुटपाथवर लावण्यात येणाऱ्या हातगाड्या, दुकाने व तात्पुरते अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी वाहनचालक व पादचारी यांच्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन वाहतुकीवर परिणाम होत असून अपघातांची शक्यता वाढत आहे. त्यामुळे या अतिक्रमणांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या पत्राची तात्काळ दखल घेत अतिक्रमण विभाग (क्षेत्रीय ‘ड’ कार्यालय) यांच्या वतीने आश्विनी गायकवाड, सहायक आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सरसगट धडक कारवाईचे आदेश दिले.
ही कारवाई श्रेयश अटकोरे, मुख्य बिट निरीक्षक यांच्या निदर्शनात पार पडली. कारवाईदरम्यान सुरक्षा बल गटाचे ८ जवान व चालक यांचा समावेश होता.
महापालिकेच्या पथकाने वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव आणि सांगवी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असून शहरातील फुटपाथ मोकळे करून पादचाऱ्यांची सुरक्षितता व वाहतूक सुरळीत करण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाणार आहे.
या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महापालिकेने अशीच सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





